आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत 

सर्व प्रकारच्या 

वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

संतोष शिराळे, सातारा :

मुसळधार पावसाचा इशारा, भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट मार्ग (राज्य महामार्ग क्र. १३९) ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), रायगड पोलीस, तहसीलदार पोलादपूर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे, दगड घसरणे, रस्ता खचणे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटांसाठी अतिसंवेदनशील असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने नमूद केलेली प्रमुख कारणे

दरडी व मोठे दगड रस्त्यावर कोसळण्याचा धोका. 

झाडे उन्मळून रस्त्यावर पडण्याची शक्यता. 

ओढे-नाल्यांना पूर येऊन रस्त्यावरून पाणी वाहण्याचा धोका. 

रस्ता खचणे व भरावाची धूप. दाट धुके व कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका.

बचाव व आपत्कालीन यंत्रणांच्या कामात अडथळे

वाहतुकीबाबत महत्त्वाचे आदेश

३ ते ६ जुलैदरम्यान आंबेनळी घाट सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद. 

जिल्ह्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट लागू असताना हलक्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील.

पावसाळ्यात रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवरही बंदी राहणार आहे.

पर्यायी मार्ग

प्रशासनाने वाहनचालकांना पुढील मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 

माणगाव – ताम्हिणी – पुणे – सातारा, तसेच 

पोलादपूर – चिपळूण – पाटण – सातारा – कोल्हापूर.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा तसेच हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments