साताऱ्यातील सदरबझारमध्ये
जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन
उत्साहात संपन्न
सातारा शहरात होणार १७ ठिकाणी हिंदू संमेलने
सातारा : गेली अनेक दशके अनेक संघटना हिंदू समाजाच्या हितासाठी काम करत आहेत. त्यातील एक महत्त्वाची संघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली १०० वर्षे हिंदूंचे संघटन करत आहे. त्याचबरोबर हिंदूचे संरक्षणासाठी महत्त्वाचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे आणि हिंदू संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कायम हातभार लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात हिंदू संमेलने आयोजित करून हिंदूंची एकजूट करण्याचे काम सुरू आहे.
सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषतः आपल्या 'सदर बझार'च्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. सध्या संपूर्ण देशभर हिंदू समाजामध्ये एक मोठी जागृती पाहायला मिळत आहे. या महान संस्कृतीचे रक्षण, परंपरांचे जतन आणि विखुरलेल्या हिंदू शक्तीला एका सूत्रात गुंफण्यासाठी ठिकठिकाणी 'हिंदू संमेलनांचे' आयोजन केले जात आहे. सातारा शहरात एकूण १७ संमेलनांची एक मोठी मालिका आयोजित करण्यात आली असून, त्याचे पहिले आणि मानाचे हिंदू संमेलन दि. एक व दोन एप्रिल रोजी सदर बझार येथील श्री हनुमान मंदिर परिसरात संपन्न झाले.
या संमेलनामागचे प्रमुख उद्दिष्ट आणि विषय हे ऐक्य आणि संघटन करून जाती-पातींच्या पलीकडे जाऊन केवळ 'हिंदू' म्हणून एकत्र येणे. सांस्कृतिक वारसा जपून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या गौरवशाली परंपरा आणि मूल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. सामाजिक जागृती करताना राष्ट्रहित आणि समाजासमोरील सद्य आव्हानांवर विचारमंथन करणे. धर्माभिमान ठेवून आपल्या सण-उत्सवांचे महत्त्व सांगून धर्माप्रती आदर वृद्धिंगत करणे आणि या निमित्ताने सर्व हिंदूंना एकत्रित करणे हे आहे.
सदर बझार हा नेहमीच उत्साही आणि सामाजिक कार्यांत अग्रभागी राहणारा भाग आहे. आजच्या या पहिल्या संमेलनातून जो एकतेचा संदेश दिला गेला तो संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास सदर बझार हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष , नगरसेवक शंकर माळवदे यांनी व्यक्त केला.
समाजामध्ये एकूण ५० टक्के हिस्सा हा मातृशक्तीचा आहे. सदर बझार येथील हिंदू संमेलनासाठी सुद्धा बहुसंख्येने मातृशक्ती उपस्थित होत्या.
१ एप्रिल रोजी सदरबझार पेठेतून काढण्यात आलेली शोभायात्रा खूपच उत्कृष्ट होती. श्री महिषासुर मर्दिनी, श्री हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी चांगले काम केले. वासोळे येथील भजनी मंडळ, कीर्तन मंडळ यांनी चांगले सादरीकरण केले. ऐतिहासिक शस्त्रविद्या प्रदर्शन सुद्धा चांगले होते. स्थानिक पुरुष, युवक, बाल मातृशक्ती यांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता.
फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांनी विविध वेशभाषेत येऊन ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणीची आठवण करून दिली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमातील शाहीर श्री शुभम भुतकर यांचा पोवाडा अंगावर रोमांच उभा करत होता. मातृशक्ती सौ.भक्ती डाफळे यांचे मार्गदर्शन हिंदू महिला मुलींसाठी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त होतेच पण त्याबरोबरच पुरुषांचे आणि युवकांचे सुद्धा कान उघाडणी करणारे होते. परमपूज्य महंत श्री परशुरामजी महाराज वाघ, मठाधिपती कार्तिक स्वामी मंदिर, देवदरी, अभेरी, तालुका खटाव याचे संतांचे आशीर्वचन सुद्धा हिंदू समाजाचे डोळे उघडायला लावणारे आणि हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाची गरज सांगणारे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, महामार्ग आयामाचे प्रांत कार्यकारणी सदस्य श्री युवराज कुलकर्णी यांचे संघाची स्थापना, उद्देश आणि कार्य या बाबतीतले मार्गदर्शन हिंदू समाजाने एकत्र कशासाठी आले पाहिजे. त्यामुळे काय काय साध्य होईल यासाठी महत्वपूर्ण होते. नारायणी समूहाच्या माता भगिनींनी राम तांडव सादर करून कार्यक्रमाला एक चांगले उठावदार स्वरूप आणले होते.
सर्वांनी या कार्यक्रमात पुरते मर्यादित न राहता हिंदू समाजाच्या एकत्रीकरण, संरक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत राहूया, अशी अपेक्षा सदरबझार हिंदू संमेलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. शंकर गोसावी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता मंचाचे प्रांत संयोजक मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये, सातारा शहर कार्यवाह रवी गायकवाड, सदर बझार हिंदू संमेलन समिती कोषाध्यक्ष चंद्रशेखर पानसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सदरबझार हिंदू संमेलन समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक, युवा कार्यकर्ते, माता भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!