महायुतीच्या चर्चेत शिंदे गटावर अन्याय झाल्यास साताऱ्यात आठही मतदारसंघांवर दावा ठोकणार

 


महायुतीच्या चर्चेत शिंदे गटावर

अन्याय झाल्यास साताऱ्यात

आठही मतदारसंघांवर दावा

ठोकणार : शिवसैनिकांचा इशारा

जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. सातारा, कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागेवर शिवसेनेचा झेंडा मुख्यमंत्री शिंदे यांना फडकवायचा आहे. महायुतीच्या चर्चेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटावर अन्याय झाल्यास सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांवर दावा ठोकण्याची शिंदे गटाची तयारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिक प्राणपणाने सज्ज राहतील, अशी भूमिका सातारा येथे झालेल्या जिल्हाप्रमुख व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेतली आहे. 

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेत कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले. पुरुषोत्तम जाधव विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणांगणात उतरणार असून, शिवसेना कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. पितृपंधरवडा संपल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची थेट संवाद यात्रा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.

या बैठकीला जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रणजीत भोसले, सुलोचना पवार, हेमलता शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक पैलवान गोडसे, चंद्रकांत गुरुजी, वासुदेव माने, बाळासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. सातारा, कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागेवर शिवसेनेचा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडकवायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रमध्ये महायुतीचे तिन्ही घटक पक्ष सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी चांगली राहिली. त्यादृष्टीने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले आहेत. 

महायुतीच्या चर्चेत शिवसेनेच्या शिंदे गटावर अन्याय झाल्यास जिल्ह्यातील आठ मतदारसंघांवर दावा ठोकण्याची शिंदे गटाची तयारी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना महायुतीत पाठबळ देण्यासाठी शिवसैनिक सज्ज राहतील, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली आहे. 

यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, "सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीत शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. शिवसैनिकांनी बूथ पातळीपासून प्रामाणिकपणे काम केल्यास विजय अवघड नाही. जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या भावना एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचवल्या जातील. लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या माध्यमातून महिला संघटनेचे मोठे जाळे जिल्ह्यात उभे राहिले आहे. लाडक्या बहिणींना सातारा जिल्ह्यात काय अडचणी येत आहेत, तसेच शासनाने राबवलेल्या कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत, याची माहिती देण्यासाठी पितृपंधरवड्यानंतर वाई - खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर तालुक्यातून शिंदे गटाची संवाद यात्रा सुरू होईल. सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी, बूथ रचना तसेच शासकीय योजनांचा प्रसार व प्रचार या सर्व दृष्टीने सूचित केले आहे. शिवसैनिकांनी त्या दृष्टीने तयारीत राहावे."

पुरुषोत्तम जाधव यांचा जिल्हा दौरा पण, 

लक्ष मात्र वाई विधानसभा मतदारसंघावर!

दुष्काळी तालुका म्हणून शिक्का लागलेल्या खंडाळ्याचा एकही आमदार अद्यापपर्यंत झाला नसल्याची खंत खंडाळावासीयांची आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची भूमिका घेतलेली आहे. २००९ पासून गेल्या १६ वर्षांत पुरुषोत्तम जाधव यांचा जनाधार हा सातत्याने दिसून आला आहे. खंडाळा तालुक्याचे दुष्काळी प्रश्न सोडविण्यासाठी जाधव यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडून निधी आणला आहे. निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा जिल्हा दौरा सुरू होणार असला, तरी त्यांचे लक्ष वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघावर आहे. महायुतीच्या राजकीय तडजोडीमध्ये बऱ्याचदा त्यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे थांबावे लागले. मात्र, यंदा पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्याच्या अस्मितेसाठी आक्रमक होणार हे निश्चित आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!

Post a Comment

0 Comments