धैर्यशील कदमांच्या उमेदवारी

अर्जावेळी महायुतीतील "त्या" 

प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती..!

सातारा झेडपी सत्तासंघर्षाचीच राजकीय किनार?

सातारा (संतोष शिराळे) : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप-महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या अनुपस्थितीमागे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान निर्माण झालेला वाद आणि नाराजी असल्याची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे.

धैर्यशील कदम यांच्या उमेदवारी अर्जावेळी महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असले तरी सातारा जिल्ह्यातील काही प्रभावी नेत्यांनी कार्यक्रमापासून अंतर राखल्याचे दिसून आले. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत महायुतीतील समन्वयाचा अभाव उघडपणे समोर आला होता. सत्तास्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या मतभेदांमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीतही या नाराजीचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि सांगलीचे शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्यात झालेल्या बैठकीनेही या चर्चांना अधिक बळ दिले आहे. सातारा जिल्हा परिषद निवडीतील घडामोडींनंतर शिवसेना स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या भेटीतून मिळाल्याचे मानले जात आहे.

महायुतीकडून अधिकृतरीत्या कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले जात असले तरी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची मतांची गणिते मजबूत असली तरी अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष भविष्यातील समीकरणांवर परिणाम करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील घटनाक्रम हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचे पडसाद आता विधानपरिषद निवडणुकीतही उमटताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीतील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धैर्यशील कदम यांच्या उमेदवारी अर्जावेळी दिसलेली अनुपस्थिती ही केवळ योगायोग की सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षातून निर्माण झालेल्या नाराजीची राजकीय अभिव्यक्ती, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.